डीपीआर तयार : शहरासाठी मिळणार 167 एमएलडी पाणी
पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेतर्फे भामा आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येणार आहे. त्याबाबतचा (डीपीआर) विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करावे लागणार आहे. तसेच, कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महापालिका पाणीपुरवठा विभागात आज याबाबत बैठक झाली. स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता, सल्लागार आदी या बैठकीला उपस्थित होते. प्रकल्पाचे नियोजन काय असेल? हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काय करता येईल, आदींबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. स्थायी समितीचे सभापती मडिगेरी यांनी हे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या. काम तातडीने सुरू करण्यासाठी काही पर्याय काढता येईल का, याबाबत नियोजन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांपर्यंत जाऊन पोहचली आहे.
शहरात समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. प्रतिदिन सुमारे 480 दशलक्ष लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे तर, 30 दशलक्ष लिटर इतके पाणी एमआयडीसीकडून देण्यात येत आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता शहराची पाण्याची तहान मोठी आहे. अशा परिस्थितीत आंद्रा व भामा आसखेड धरणातून एकूण 267 दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात सद्य:स्थितीत आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक कामे सुरू आहेत. चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी, जलवाहिन्यांची कामे आदींचा त्यामध्ये
समावेश आहे.
भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका.
पालिकेने आतापर्यंत दिले 20 कोटी रुपये
भामा आसखेड धरणातून पुणे महापालिकेतर्फे देखील पाणी उचलण्यासाठी आवश्यक प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे पुणे महापालिकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी महापालिकेला धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात देखील अडथळे येऊ शकतात. धरणातून पाणी उचलताना सिंचन पुर्नस्थापना खर्चाऐवजी पुनर्वसन खर्च द्यावा, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महापालिकेने एकूण किती पुनर्वसन खर्च द्यायचा, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप कळविलेली नाही. तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 20 कोटी रुपये आत्तापर्यंत देण्यात आले आहेत.