मुंबई – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी “सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाले. सुत्रांच्या माहितीनुसार, या तीनही नेत्यांमध्ये आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत राज्यातील आगामी काळातील महत्त्वाच्या घडामोडी अवलंबून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसे करावे, कुणाला किती जागा द्यायच्या, याबाबत या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे.
या बैठकीत कुणाला कुठल्या जागा द्यायच्या, याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची एकजूट झाली. या विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या इंडिया आघाडीच्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडल्या आहेत.
पण त्यानंतर इंडिया आघाडीच्या फार बैठका पार पडल्या नाहीत. तसेच उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमधील संबंध ताणले गेले असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संबंध दृढ राहिले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केला जातोय, असे देखील बोलले जात आहे.
आगामी निवडणुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही भेट झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद आवश्यक आहे, तो संवाद व्हावा यासाठी ठाकरे आणि पवार या दोन नेत्यांची आज भेट झाली असल्याचे देखील बोलले जात आहे.