पुणे – हाथरस येथील घटना क्लेशदायकच आहे. पण महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारने डोळे झाकले आहेत. सरकार महाराष्ट्राला लुटायला बसले आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे.
मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांसाठी राज्यात सुरक्षित वातावरण नसल्यास सरकारला झोपू देणार नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला अत्याचाराविरोधात “आक्रोश आंदोलन’ केले.
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. गृहमंत्री फोटो सेशनमध्ये व्यस्त आहेत. महिलांबाबत न्याय द्यायला सरकारला वेळ नाही. सरकार स्थापन करण्याचा कौल भाजपला होता.
परंतु, शिवसेनेने गद्दारी केली. हे तत्त्वहीन सरकार आहे. सरकारला बदल्या करण्यात स्वारस्य असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्याचे मुळीक म्हणाले.