कोयनानगर – जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय सामंजस्य करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला चालना देणारा अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबंधित विभागांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने निर्देश दिले.
कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर शिवसागर जलाशयाच्या तीरावर मौजे मुनावळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जागतिक दर्जाचा नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जागेची पाहणी करून या प्रकल्पाबाबत सूचना दिल्या होत्या.
या प्रकल्पाकरिता महसूल आणि जलसंपदा विभागाकडे असणारी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सामंजस्य करार पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यानुसार पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी दोन्ही महामंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याबाबत निर्देश दिले.
या बैठकीस पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. या कराराच्या मसुद्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
अशा आहेत अत्याधुनिक सुविधा…
मुनावळेतील या जल प्रकल्पास ४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामुळे पर्यटन वाढ होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचा समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे.
जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आग्रही आहेत. त्यादृष्टीने मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सामंजस्य करार पूर्ण करून लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.