हैद्राबाद: लॉकडाऊनमध्ये अडलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी एका आईने तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास केला आहे. सदर महिला तीन दिवसांत आपल्या मुलाला परत घरी घेऊन आली आहे. ही घटना तेलंगाणाच्या निजामाबाद येथील आहे.
तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या 50 वर्षीय रजिया बेगम या सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांची परवानगी घेऊन एकट्या गाडीने आंध्रप्रदेशच्या नेल्लौरच्या दिशेने निघाल्या. हे अंतर जवळपास 700 किलोमीटरचे होते.
लॉकडाऊनमुळे सर्व रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत. याचं सुन्या महामार्गांवरुन स्कूटर चालवत नेल्लौरला पोहचल्या. त्यानंतर आपल्या मुलाला स्कूटरवर मागे बसवून त्या बुधवारी सायंकाळी निजामाबादला त्यांच्या घरी परतल्या. या संपूर्ण प्रवासादरम्यान रजिया बेगम यांनी 1400 किलोमीटरपर्यंत स्कूटर चालवली. म्हणजेच त्यांनी दरदिवसाला जवळपास 470 किलोमीटर स्कूटर चालवली.
रजिया बेगम म्हणाल्या, हा प्रवास दुचाकीवरून करणे खुपच त्रासदायक होते. पण मुलाला आणण्यासाठी माझ्या जिद्दीने सर्व भीती निघाली. हो पण, रात्री मला खूप भीती वाटली जेव्हा रस्त्यावर नाही कुठला माणूस होता, नाही कुठली वाहतूक.
रजिया बेगम या निजामाबाद जिल्ह्याच्या बोधन परिसरात एक सरकारी शाळेत प्राध्यापिका आहेत. बोधन हे हैद्राबादपासून 200 किलोमीटर दूर आहे. रजियाचे पती यांचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा 17 वर्षीय मुलगा निजामुद्दीन हा एमबीबीएससाठी तयारी करत आहे. निजामुद्दीन हा नेल्लौरला त्याच्या मित्राला सोडायला गेला होता. पण, लॉकडाऊन झाल्याने तो तिथेच फसला होता.