पुणे -“शहरात पावसाचा जोर कमी झाला असून, पुढील दोन दिवस आकाश ढगाळ आणि हलक्या सरी पडतील. त्यानंतर पाऊस विश्रांती घेईल आणि कमाल तापामनात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातून परतेल,’ असेही हवामान विभागाकडील तज्ज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.
नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर व वायव्य भारतातून परतला असून, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात कोकण-गोवा वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातून परतण्यास सुरुवात होईल. दरम्यान, कोकण-गोवा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात मागील दोन दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभर ढगाळ आणि अधून-मधून ऊन असे वातावरण आहे. तर उपनगरांत काही भागात पावसाच्या एक-दोन हलक्या सरी पडत आहे. दि. 5 ऑक्टोबरपर्यंत शहरात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडतील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल आणि तापमानात वाढही होण्याची शक्यता वर्तवली आहे.