मुंबई – महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तरेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. मान्सूनने रविवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली.
त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण देशाला व्यापणार आहे.
महाराष्ट्रात 5 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापले होतें. मुंबईत तर मान्सूनने दमदार आगमन करत मुंबईकरांना पुरतं झोडपून काढले होते. यानंतर आता मान्सूनने उत्तरेकडे प्रवास सुरू केला आहे.
दरम्यान ईशान्य भारतातील बऱ्याच राज्यात पावसाने हजेरी लावली होती. मान्सूनने महाराष्ट्रातून पुढच्या दिशेने मार्गक्रमण केले असले तरी राज्यात अद्याप बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकणात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील आणखी काही तास दक्षिण कोकणासह गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातही उद्या बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.