नवी दिल्ली – देशातील महागाईचा दर विक्रमी पातळीवर गेला आहे. आज घाऊक महागाईचा दर 12.94 टक्क्यांवर गेला आहे. कच्चा तेलाचे वाढलेले दर, त्यातून उत्पादीत मालांच्या वाढलेल्या किमती यामुळे ही महागाई वाढली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे 3.37 टक्के इतका होता. त्याच्या नेमकी विपरीत स्थिती या वर्षीच्या मे महिन्यात दिसून आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की कच्चा तेलांचे व खनिज तेलांच्या वाढलेल्या किंमतींचा हा परिणाम आहे.
तशातच मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टच्या दरातही मे महिन्यात मोठी वाढ होऊन ही वाढ 10.8 टक्क्यांवर गेल्याचाही परिणाम महागाईवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंधन आणि विजेच्या दरातही 37.6 टक्के इतकी वाढ झाली आहे.
दरम्यान मे महिन्यात अन्न पदार्थांच्या महागाईचा दर 4.31 टक्के इतका नोंदवला गेला आहे. कांद्याच्या दरात मात्र 23.24 टक्के इतकी वाढ मे महिन्यात झाली आहे.