मुंबई, – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी जाधव यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला.
राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावरून लक्षवेधी चर्चेदरम्यान ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे विधान केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ सुरू केला.
फडणवीस यांनी भास्कर जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. मी माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांकडून होतो आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले.
एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्याने माणूस लहान होतो असे नाही, मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो, शब्द मागे घेतो म्हटले तर देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. पण या सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालायचे असेल आणि मी पंतप्रधानांबद्दल बोलल्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते, तोच मी उल्लेख केला, तरी देखील मी माफी मागतो, असे भास्कर जाधव म्हणाले.
मी हक्कभंगासाठी तयार आहे
कोणताही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली. पण विरोधी पक्षनेत्यांनी संगितले की आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी जरूर आणावा, मी त्यासाठी तयार आहे, असे आव्हान देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.