नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावरून अखेरचा हादरा बसला, अशी प्रतिक्रिया भाजपकडून सोमवारी देण्यात आली. त्याबाबत बोलताना भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव म्हणाले, मोदी-ट्रम्प भेट पाकिस्तानसाठी शेवटचा आशेचा किरण होता. त्या भेटीतून आपल्यासाठी अनुकूल निवेदन केले जाईल, असे पाकिस्तानला वाटत होते.
मात्र, भारत आणि पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यावर द्विपक्षीय स्तरावरच चर्चा व्हावी या बाबीवर त्या भेटीने शिक्कामोर्तब झाले. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यासंबंधीची भारताची भूमिका अमेरिकेने आधीच मान्य केली असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय आमची अंतर्गत बाब असल्याची ठाम आणि रास्त भूमिका भारताने घेतली आहे