नवी दिल्ली: खाजगी तत्वावर धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीला एक तासापेक्षा जास्त काळ उशीर झाला तर आता भरपाई मिळणार आहे. वेगासाठी प्रसिध्द असलेल्या तेजसच्या दोन मार्गावरील गाड्या चालविण्याचे हक्क अलिकडेच भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीला दिले आहेत. यातील दिल्ली ते लखनौ या मार्गावरील गाडी ऑक्टोबर महिन्यापासून, तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तेजस गाडी नंतरच्या काळात आयआरसीटीसीकडून चालवली जाणार आहे.
तेजस गाडीचे भाडे निश्चित करताना सध्या धावणाऱ्या शताब्दी गाडीच्या भाड्याचा विचार केला जाणार आहे. दर्जेदार जेवण देण्याबरोबरच तेजस गाड्यांमध्ये चहा आणि कॉफी वितरणासाठी वेंडींग मशिन लावले जाणार आहे. दिल्ली-लखनौ मार्गावर रेल्वेकडून सकाळच्या वेळी प्रवाशांना नाश्ता दिला जातो. लखनौ येईपर्यंत जेवणाची वेळ होते.
आयआरसीटीसीकडून जी तेजस गाडी चालवली जाणार आहे, त्यात प्रवाशांना नाश्त्याशिवाय हलकेफुलके स्नॅक्स दिले जाणार आहे. गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पन्नास लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच दिले जाणार असून रेल्वेत सामानाची चोरी झाली, तर त्याची भरपाईदेखील दिली जाणार आहे.
तेजसची नकारात्मक बाजू म्हणजे प्रत्येक डब्यात दोनच स्वच्छतागृह असणार आहेत. रेल्वेकडून चालविणाऱ्या गाड्यांत सध्या चार स्वच्छतागृहे असतात. विमानात 190 प्रवाशांसाठी तीन स्वच्छतागृहे असतात, तर रेल्वे डब्यातील सुमारे 70 प्रवाशांसाठी दोन स्वच्छतागृहे का पुरेशी ठरू नयेत, असा तर्क यामागे दिला जात आहे.