नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवरील शाब्दिक हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. आता देशाच्या फेरउभारणीसाठी मोदींनी चुका मान्य करून तज्ञांची मदत घ्यावी, असे राहुल यांनी म्हटले आहे.
जागतिक बॅंकेच्या हवाल्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. करोना संकटकाळात जगभरात गरिबीमध्ये वाढ झाली. त्यामध्ये भारताचा वाटा 57 टक्क्यांहून अधिक असल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अहवाल ट्विटरवरून शेअर करत राहुल यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.
तो अहवाल म्हणजे करोना संकट हाताळणीतील सरकारच्या गैरव्यवस्थापनाचा परिणाम आहे. मात्र, आता आपल्याला भविष्याकडे पाहायला हवे. जोपर्यंत चुका मान्य करून मोदी तज्ञांची मदत घेत नाहीत; तोपर्यंत देशाची फेरउभारणी सुरू होणार नाही. नाकबुलीच्या भूमिकेत वावरण्याने कुठलीच समस्या सुटणार नाही, असे राहुल यांनी म्हटले.