नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नव्या लोकसभेचे आणि संसदेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी लोकांच्या आशा आणि आकांक्षा पुर्ण करण्यासाठी संसद अधिवेशनाचा आपण सर्वांनीच चांगला उपयोग करून घ्यावा अशी सुचना करतानाच विरोधकांनी सरकारला या अधिवेशनात पुर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बैठकीनंतर दिलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की विरोधकांनी व सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत मोैलिक सुचना केल्या. सर्वांनीच अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देण्याचे ठरवल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत.संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त विधेयकांसह अन्यही महत्वाची विधेयके सादर केली जाणार आहेत.
सरकारला लोकसभेत पुर्ण बहुमत आहे तथापी राज्यसभेत अजूनही सरकारकडे बहुमत नाही. तेथे एकूण 245 सदस्य संख्येपैकी सरकारकडे 102 सदस्य आहेत. त्यामुळे महत्वाच्या विधेयकांना राज्यसभेत मंजुरी घेण्यासाठी सरकारला विरोधकांचे सहकार्य घ्यावेच लागणार आहे. या महत्वाच्या विधेयकांमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाचाही समावेश आहे.
दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या गोटात मात्र अजून सामसुमच आहे. पराभवाच्या धक्क्यातून अजून कॉंग्रेस पक्ष बाहेर आलेला नाहीे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी पक्षाची जी बैठक होणे अपेक्षित आहे तीही अजून झालेली नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी अद्याप ठाम असल्याने कॉंग्रेस मधील अनिश्चीततेचे वातावरण अद्याप कायम आहे.