पुढील आठवड्यापासून 42 टक्क्यांपर्यंत सेवा महागणार
पुणे – ठरल्याप्रमाणे मोबाइल कंपन्यांनी 40 ते 42 टक्क्यांदरम्यान दरवाढ केली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मोबाइल सेवेचे दर गेल्या चार वर्षांपासून फारसे वाढले नव्हते. मात्र कर्ज आणि देणी वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय कंपन्यांनी सामूहिकपणे घेतला आहे.
जिओही महागणार
रिलायन्स जिओ कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार ही कंपनी व्हॉइस आणि डेटा साठीची दरवाढ 40% करणार असून याची अंमलबजावणी 6 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. कॉलचे दर काय असावेत, यासंदर्भात जर सरकार किंवा ट्राय काही प्रयत्न करणार असेल तर त्याला सहकार्य करण्याची तयारी या कंपनीने दर्शविली आहे.
एअरटेलची 42 टक्के दरवाढ
एअरटेल कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी व्हॉइस व डेटा दरात 42 टक्के वाढ केली असून ती दि.3 डिसेंबरपासून लागू होणार आहे. वेगवेगळ्या प्लॅनसाठीची ही दरवाढ पन्नास पैशापासून 2 रुपये 85 पैसे प्रति दिवसापर्यंत लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमर्यादित वर्गासाठी 24, 28, 84 आणि 365 दिवस वैधतेचे प्लॅन जाहीर केले आहेत. ग्राहक ही दरवाढ स्वीकारतील, असे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डिसेंबरपासून मोबाइल सेवा सुरू ठेवण्यासाठी एअरटेल ग्राहकांना किमान 50 रुपये प्रतिमहिना द्यावे लागणार आहेत.
…तर वोडाफोन पैसे आकारणार
इतर कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वोडाफोन-आयडिया कंपनीनेही ग्राहकासाठी कॉल आणि डेटा साठी 42 टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. गेल्या काही काळात या कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचा महसूल जास्त असल्यामुळे या कंपन्यांना सरकारला 1.47 लाख कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.