पिंपरी- धार्मिकस्थळे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी (दि.6) आकुर्डीतील खंडोबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना हजारो नागरिक एकत्र आले तर करोनाचा प्रादूर्भाव होत नाही मात्र, धार्मिकस्थळे उघडल्यानंतर प्रदूर्भाव होऊ शकतो, या तर्काची खिल्ली उडवत, महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले.
पंढरपूरची झालेली पोट निवडणूक असो; पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन असो अथवा काल-परवा झालेला जुन्नर आंबेगावमध्ये झालेला कार्यक्रम असो किंवा शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भरगच्च मेळावे असो त्या वेळेला कुठेही करोना नसतो. परंतु हिंदू सणांची ज्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा समोर येते त्या वेळेला मात्र निमित्त करून हे हिंदूंची गळचेपी करायचा कार्यक्रम हे सरकार करत असल्याचा आरोप शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून तुमच्या लोकांना तुम्ही झुकते माप देणार आणि जे हिंदूंचे पाठीराखे आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार, अशा गोष्टीला मनसे सर्व शक्तीनिशी विरोध करेल व हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
या आंदोलनात विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, कामगार शहराध्यक्ष रूपेश पटेकर, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, जनहित शहराध्यक्ष राजू भालेराव, चित्रपट सेना शहराध्यक्ष दत्ता घुले, राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितिन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्झांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.