नगर – ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासून नगर शहराला प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहराच्या विकासाबाबत नागरिकांना सोबत घेऊन शासनाला सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे विकास आराखडा सादर करावयाचा आहे.
विविध मान्यवरांकडून व पर्यटन प्रेमींकडून माहिती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहर पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आ. संग्राम जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून निमंत्रित व्यक्तींच्या बैठकीत आ. जगताप बोलत होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार ऍड. बाळ ज. बोठे पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, सुधीर लंके, उद्योजक अण्णासाहेब मुनोत, प्रा. माणिकराव विधाते, गणेश भोसले, श्रीधर केळकर, रमेश जंगले, भूषण देशमुख, नाना बोज्जा, आर्किटेक्ट सलीम शेख, प्रा. सीताराम काकडे, विशाल लाहोटी, संदीप जोशी, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, आदेश चंगेडिया, शारदा होशिंग, रफिक मुन्शी, श्रीकांत मांढरे, ऍड. आर. आर. पिल्ले
प्रियदर्शन बंडेलू, संजय चोपडा, ऋषिकेश येलूलकर, सुदर्शन कुलकर्णी, महेश कांबळे, मेहेर तिवारी आदी उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले, विकासकामे करीत असताना विविध अडचणींना व संकटाला सामोरे जावे लागते. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिला प्रश्न मांडला तो, सीना नदीवरील अतिक्रमण काढून हद्द निश्चितीचा, आज ही दोन्ही कामे पूर्ण झाली. लवकरच सीना नदीचा विकास आराखडा तयार केला जाईल. महापौर असताना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सीना नदीच्या सुशोभिकरणासाठी साडे तीनकोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता. परंतु काहींनी ते काम बंद पाडले आणि तो निधी परत गेला.
नगर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी गेल्या 2 वर्षापूर्वी कचराकुंडीमुक्त शहर करण्याची संकल्पना केली होती. त्यानंतर शहरामध्ये गाड्या आणून संपूर्ण शहर कचरामुक्त केले आहे. आज शहरात कुठेही कचराकुंडी दिसणार नाही. आकाशवाणी केंद्र ते भिस्तबाग महालापर्यंतचा रस्ता हा मॉडेल रस्ता करणार आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहे. शहराबद्दल प्रत्येकाने प्रेमाची व आपुलकीची भावना दाखविली पाहिजे. यासाठी सर्व नगरकरांना सामावून घेतले जाईल.
नगर शहर हे माझे कुटुंब आहे या भावनेतून व सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षी विकास आराखड्यातील एक-एक प्रश्न मार्गी लावला जाईल. यावेळी विविध मान्यवरांनी पर्यटन विकासासाठी बैठकीत विविध सूचना मांडल्या. यावेळी कोहिनूरचे संचालक स्व. दीपक गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. जयंत येलूलकर यांनी बैठकीमागील हेतू विषद केला.