ठाणे – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात यंत्रणाचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाला आहे. राज्यातील काही नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावरही खोटे आरोप करण्यात आले, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. ते आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आनंद मठ येथे माध्यमांशी बोलत होते.
रश्मी शुक्ला प्रकरणी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात अनेक खोटे आरोप, खोट्या कारवाया करण्यात आल्या होत्या. सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात फडणवीसांना क्लीनचीट दिली आहे. म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीने केलेले आरोप पूर्णपणे खोटे होते, असे म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित करताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांवर आरोप करून खटला भरण्यात आला होता. असे अनेक प्रकार मविआच्या काळात घडले आहेत.
शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोटे आरोप करून अनेक बड्या नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्लॅन होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा आणि अभिनेत्री कंगना रनौट यांच्यावर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, याची मला चांगली माहिती आहे. सत्तेचा व यंत्रणेचा सर्रासपणे गैरवापर ठाकरे सरकारच्या काळात झाला. पण सीबीआयने तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे, असेही शिंदे म्हणाले.
जनता विरोधकांना धडा शिकवेल
महाविकास आघाडीच्या काळात यंत्रणाचा मोठ्या दुरूपयोग झाला आहे. आज कोण कोणावर आरोप करत आहे, हे राज्यातील जनता बघत आहे. परंतु सीबीआयच्या चौकशीमुळे ही बाब आता उघड झाली आहे. राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे येत्या काळात जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.