नवी दिल्ली – तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ रामेश्वरमला जाणाऱ्या रेल्वेच्या खासगी बोगीत भीषण आग लागली. मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितल्यानुसार आत्तापर्यंत या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 हून अधिक लोक होरपळले आहेत. बहुतांश मृतक उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत. सीतापूरच्या एका ट्रॅव्हल एजन्सीने या खासगी डब्याचे थर्ड पार्टी बुकिंग केले होते. त्यात 63 जण प्रवास करत होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5.15 च्या सुमारास ही आग लागली. त्यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबली होती. यानंतर अग्निशमन दलाने 5.45 वाजता आग विझवण्याचे काम सुरू केले. सकाळी 7.15 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. केवळ खासगी डब्यांना ही आग लागली होती. अग्निशमन दलाने ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश मिळवले.
डब्याला आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे बेकायदेशीरपणे वाहून नेले जाणारे सिलिंडर. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आयआरसीटीसीद्वारे कोणीही कोच बुक करू शकतो, परंतु सिलिंडर घेऊन जाण्यास बंदी आहे. असे असतानाही एक प्रवासी सिलिंडर घेऊन चढला. डीआरएमसह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आहेत. जखमींना मदुराईच्या शासकीय राजाजी महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई
आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे पाहून रेल्वेने तत्काळ शेजारील बोगी वेगळ्या केल्या, ज्यामुळे आग इतर बोगींमध्ये पसरली नाही. आगीत एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.