लखनौ – केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष याला सरकार पाठीशी घालत आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घ्यायला या सरकारला वेळ नाही, अशा शब्दात कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खेरा प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मोटारीने सहा शेतकऱ्यांना उडवले. त्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. मात्र तुम्ही पहात आहात, हे सरकार मंत्री आणि त्यांच्या मुलाची पाठराखण करत आहे?
सहा नागरिकांना चिरडणाऱ्या व्यक्तीला चर्चेसाठी पोलीस बोलवतात, असे जगात कोणत्या तरी देशात घडले आहे का?, असे प्रियांका म्हणाल्या. वाराणसीतील किसान न्याय मेळाव्यात त्या बोलत होत्या.
सार्वजनिक व्यासपीठांवरून मुख्यमंत्री मंत्र्यांची पाठराखण करतात. पंतप्रधान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला लखनौमध्ये येतात. पण मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुुटंबियांच्या दू:खावर फंकर मारण्यासाठी लखीमपूर खेरीला जात नाहीत.
शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मागण्या सहानुभूतीने ऐकल्या सुध्दा जात नाहीत. 300 पेक्षा अधिक दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यात आतापर्यंत 600 जणांचा मृत्यू झाला आहे. या सरकारचे मित्र असणाऱ्या अब्जोपतींच्या घशात त्यांचे उत्पन्न, भूमी आणि पीके घालण्याचा त्यांचा डाव असल्याचे त्यांना माहित आहे, म्हणून ते आंदोलन करत आहेत.
पंतप्रधान त्यांचा उल्लेख आंदोलनजीवी आणि दहशतवादी असा कुचेष्टेने करतात योगीजी त्यांना गुंड म्हणतात. तर त्यांचे मंत्री आंदोलनकर्त्याम शेतकऱ्यांना दोन मिनिटात वठणीवर आणण्याची भाषा करतात, असे त्या म्हणाल्या.
मिश्राला अखेर पोलीस कोठडी
लखीमपूर खेरा प्रकरणात आशिष मिश्रा यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी निर्माण केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र कुमार अग्रवाल यांनी रात्री 11 वाजता पत्रकारांना अटकेची माहिती दिली. तो सहकार्य करत नाही. काही गोष्टी तो सांगत नाही. सहकार्य करत नसल्याने आणि चुकीची उत्तरे देत असल्याने त्याला कोठडीत घेण्यात आले आहे. त्याची आता रितसर कोठडीत चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.