“केकावली’ या काव्यसंग्रहाने प्रसिद्ध मध्ययुगीन कविश्रेष्ठ मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत यांचा आज स्मृतिदिन (निधन 15 एप्रिल 1794 रोजी, चैत्र पौर्णिमा). मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे सन 1729 मध्ये झाला. पराडकर कुटुंब मूळचे कोकणातील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजोबा नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. मोरोपंताचे वडील कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण व विद्याभ्यासही पन्हाळगडावरच झाला. मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये यांच्याकडे केले.
वर्ष 1752 च्या सुमारास मोरोपंताचे वडील पन्हाळगडावरून बारामतीस गेले. कालांतराने मोरोपंतही बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर झाले. पन्हाळगडावर असताना थोडीफार काव्यनिर्मितीस सुरुवात झाली असली तरी बहुतांश काव्यलेखन बारामतीस झाले. बारामतीचे सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांची नेमणूक झाली होती. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबूजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता.
येथील एका खोलीत त्यांनी काव्यनिर्मिती केली. या खोलीतील भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. त्यातील ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंत आपली काव्ये सजवत असत. सुमारे 45 वर्षांच्या कालावधीत मोरोपंतानी 75 हजारांच्यावर कविता लिहिल्या असे म्हणतात. त्यांच्या नावावर 268 कवितांची नोंद आहे. त्यांनी हजारो आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली. “ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची!’ या श्लोकामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची ओळख सांगणारा उल्लेख साहित्य क्षेत्रामधे प्रसिद्ध आहे.
“केका’ म्हणजे वातावरणातील तप्तता कमी करण्यासाठी मोराने आकाशाकडे पाहून केलेले त्याच्या आवाजातील आर्जव. केकावलीच्या रचना 17 अक्षरी पृथ्वी वृत्तात रचल्या आहेत. “सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो।’ ही कविता सर्वपरिचित आहे. “पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे; दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे’ या काव्यपंक्तीतून माता पित्याच्या मनोवृत्तीचे सुंदर दर्शन होते. “झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि “बालिश बहु बायकांत बडबडला’ ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही वापरल्या जातात. पण याचे रचनाकार मोरोपंत आहेत हे कोणाच्या गावीही नसते.
एकदा मोरोपंत सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. मोरोपंतांची मधुर वाणी आणि समयोचित काव्य फेक हे वैशिष्ट्य असल्याने कथन ऐकताना श्रोते बेभान झाले. पुराण कथन संपत आले, बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय? हा विचार सरदार घोरपडे करीत होते. ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्या मनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले, “भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे। ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे।।’ घोरपड्यांनी या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला कंठा काढून त्यांच्या गळ्यात घातला.