पुणे – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. हाती आलेल्या कलांनुसार भाजप-जेडी(यु) एकत्र लढत असलेली एनडीए आघाडी बहुमताजवळ पोहचली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकांबाबत प्रतिक्रिया देताना तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
याबाबत बोलताना पवार यांनी, “एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी शरद पवार यांनी, ‘आता बदल झाला नसला तरी हळूहळू बदलाची वाट दिसू लागली आहे.’ असा आशावाद व्यक्त केला. यावेळी त्यांनी, बिहार निवडणुकांबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीत निशाणा साधत, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे’ असा टोला लगावला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल ( Bihar Election Results 2020 ) आज जाहीर होणार असून मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप-जेडी(यु) प्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. असं असलं तरी अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई सुरु असल्याने मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हेच चित्र कायम राहील याबाबत खात्री देता येणार नाही.