मुंबई: आपल्या जीवाची बाजी लावून दिवस-रात्र कर्तृव्य पार पाडत आहे. पोलिसांवर पडलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात ड्युटी लागणार आहे.
हा निर्णय लॉकडाऊनच्या बंदोबस्तात पोलीस कर्मचारी कमी पडू नये म्हणून घेण्यात आला आहे. मंत्रालयातील कर्मचारी हे महाराष्ट्रातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेत काम करणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने शासकीय आदेश जारी करण्यात आलेला आहे.
राज्यात करोनाच प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. राज्यातील तब्बल बाराशेपेक्षा जास्त पोलीस यंत्रणेतील कर्मचारी या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये परप्रांतीय कामगारांना परत त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करावी लागणार आहे त्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
परप्रांतीय कामगारांच्या परतीसाठी हे कर्मचारी काम करणार आहेत. परप्रांतीयांना परत पाठवण्यासाठी प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्यांच्याकडे याची जबाबदारी दिली.
मंत्रालयातील या कर्मचाऱ्यांची नियुक्ती मुंबईतील 93 पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने राज्यात जवळपास दीड हजार कर्मचारीवर्ग पोलिसांच्या मदतीला येतील, असा साधारण अंदाज आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये पुढील कामासाठी हजर व्हावे, असे आदेश दिले आहेत. जे कर्मचारी या संदर्भात हजर होणार नाहीत त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे.