मुंबई – आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याने त्यांच्यावर भाजपकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कौशल्य विकासाच्या अनुषंगाने काही विषय होते. पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेतीला लागणाऱ्या पाण्यांचा आढावा घेण्यात आला. सोबतच आज आम्ही सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
शंभूराज देसाई म्हणाले, गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातून येतात, त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या दीड वर्षांमध्ये एकदासुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही. आमदार गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा जो प्रकार केला तो चुकीचा आहे. तो आरोप त्यांनी पहिल्यांदाच केला आहे. त्यामुळे आम्ही आमचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेले आहे. निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस घेतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
काय आरोप केलेत गायकवाड यांनी नेमके
“एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे पैसे बुडवले आहेत. मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली होती.