मंत्री हसन मुश्रीफ: आठवडाभरात गावागावात होईल औषधांचे वाटप
कोल्हापूर(प्रतिनिधी)– ग्रामविकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मानवी प्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी मोफत आर्सेनिक अल्बम- 30 हे औषध पुरवणार असल्याचे, प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री मुश्रीफ कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले , कोरोना संसर्गाच्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम -30 हे औषध मानवी शरीरात प्रतिकाशक्ती निर्माण करते आणि ती वाढविते, असे निदर्शनास आले आहे. सरकारच्यावतीने या औषधाच्या वाटपासाठी केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरीही मिळाली आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या औषधांचे वाटप केले जाणार आहे.
सध्या राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यभरातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये जिल्हानिहाय ग्रामपंचायती, कुटुंबांची संख्या व नागरिकांची आकडेवारी संकलित करण्याचे काम मोठ्या जलद गतीने सुरू आहे. लवकरच म्हणजे पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या गावागावात व प्रत्येक घरातील प्रत्येक माणसापर्यंत औषध पोहोचवले जाईल.