गडचिरोली :- राज्यातील नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार वाढत असून आता मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर गडचिरोली पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन खाणींना पाठिंबा दिल्यामुळे धर्मराव बाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना धमकी देण्यात आली आहे.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना सध्या झेड सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा कुठलाही प्रश्न नाही, असे गडचिरोली परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात जी विकासकामे होत आहेत, त्या विकासकामांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. बंदूकीच्या जोरावर लोकांना एकत्र करुन आंदोलने केली जात आहे.
नक्षलवाद्यांचा स्ट्रॉग होल्ड असलेल्या तोडगट्टा गावाच्या एण्ट्री पॉईंटवर हे आंदोलन सुरू आहे. त्या भागात पोलीसांची वर्दळ वाढू नये म्हणून नक्षलवादी विकासकामांना विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.