नवी दिल्ली – माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर टीका केली आहे. मणिपूर घटनेवरून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कोटचा आधार घेत यासंबंधी एक ट्वीट केले. ते म्हणतात की, माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते… मणिपूरमध्ये महिलांविरोधात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अस्वस्थ वाटत आहे.
अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाने यावर तातडीने पाऊले उचलून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
दरम्यान, या आधीही केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर त्यांनी टीका केली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाहीत, पण अमेरिकेचा दौरा करतात असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शरद पवार या हिंसाचारावर सातत्याने आवाज उठवत आहेत.