भाटघर- भोर-वेल्हा तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लवकरच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची उभारणी करणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. “आम्ही भोरकर’ हे शिष्टमंडळ मंत्रालयात एमआयडीसी या विषयावर चर्चा करण्यासाठी गेले असता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक चर्चेदरम्यान आश्वासन दिल्याने बेरोजगारांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
भोर, वेल्ह्याच्या चारही बाजूला एमआयडीसी असून हे दोन तालुके मात्र एमआयडीसीपासून वंचित आहेत. या भागात मुबलक पाणी, रस्ते, महामार्गाची सुविधा असूनही एमआयडीसीची स्थापना झालेली नाही. यामुळे येथील तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, शिरवळ एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागत आहे. भोर तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील अनेक कुटुंबे रोजंदारीमुळे शहरात स्थलांतरित होत असल्याने भविष्यात काही गावे ओसाड पडण्याच्या मार्गावर आहेत.
समीर घोडेकर यांच्या पुढाकाराने “आम्ही भोरकर’ या सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी एमायडीसी बाबत उर्वरित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लवकरच एमआयडीसीची उभारणी केली जाईल. डोंगर भागात उद्योग उभारणीसाठी उपाययोजना करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, आम्ही भोरकर सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल शेटे, धीरज जेधे, सचिव मंगेश आवाळे, सदस्य नीलेश कुंभार, किशोर जंगम, गोविंद जंगम आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.