कृषीपंप कनेक्शनसाठी विलंब; शेतकरी वर्गातून तीव्र संताप
चाफळ – महावितरणचा भोंगळ कारभार सर्वांनाच ज्ञात आहे. तालुक्यातील अनेक गावातील लोकांना विज वितरणचा फटका बसला आहे. चाफळ विभागातील धायटी येथील मोहन गुमास्ते यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने वीज वितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
मोहन गुमास्ते हे कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची केळोली फाट्याजवळ पंचवीस एकर शेतजमीन आहे. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी त्यांनी केळोली फाट्याजवळील जाळेशेत शिवारात विहीर काढली होती. त्यावेळी त्यांनी वीज मागणी अर्ज करून वीज जोडणी शुल्क ही चाफळच्या महावितरण कार्यालयात भरले होते. परंतु ती विहीर सततच्या ओढ्यातून येणाऱ्या गाळमिश्रीत पाण्याने बुजून गेली. तरीही वेळोवेळी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही गुमास्ते यांना आजपर्यंत वीज कनेक्शन दिले जात नसल्याची गुमास्ते यांची तक्रार आहे.
विहीर बुजल्यामुळे चार वर्षांपूर्वी गुमास्ते यांनी परत त्याच ठिकाणी दुसरी विहीर काढली. त्या विहीरी संदर्भातील वीज मागणी अर्ज तसेच जोडणी शुल्कही परत एकदा चाफळ येथील महावितरणच्या कार्यालयात त्यांनी भरले. तरीही आजतागायत गुमास्ते यांना वीज कनेक्शन मिळाले नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचेल तेवढा कमीच आहे.
गेल्या चार वर्षांपासून गुमास्ते हे महावितरणच्या उंब्रज तसेच चाफळ येथील कार्यालयात कमीत कमी दहा ते बारा वेळा गेले असतील पण त्यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणी संदर्भात संबंधित अधिकारी टाळाटाळ करत वेळ मारून नेत असल्याने गुमास्ते यांची दुसरी विहीरही बुजून जाण्याच्या मार्गावर आहे.
चाफळ विभागात पंचवीस ते तीस वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. चाफळ तसेच उंब्रज येथील कार्यालयातील महावितरणचा भोंगळ कारभार वारंवार दिसून येत आहे. महावितरणचे हे निद्रिस्त अधिकारी गुमास्ते यांना न्याय देतील का? हा संशोधनाचा भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महावितरणच्या या वर्तनामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चाफळ विभागातील सर्व प्रलंबित कृषीपंप वीजजोडणी बाबतचे टेंडर ठेकेदाराला दिलेले असून प्रलंबित ग्राहकांची यादी ही संबंधित ठेकेदाराला दिलेली आहे. काम पूर्ण करण्याची डेडलाईन जानेवारी आहे. त्या मुदतीमध्ये काम पूर्ण होईल.
संदीप थोरात, चाफळ महावितरण कार्यालय