नवी दिल्ली – देशभरामध्ये कडक उन्हाळा जाणवत असून अनेक ठिकाणी तापमानाने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याच पाहायला मिळालं. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थानसह विविध राज्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसतंय. अशातच आता हवामान खात्याने तापमानवाढीबाबत वर्तवलेल्या एका अंदाजामुळे तुम्हाला धडकी भरू शकते. यावेळी कमाल तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची हादरवणारी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून पारा ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे IMD ने सांगितले आहे. मे महिना हा सर्वात उष्ण महिना असल्याने, पश्चिम राजस्थानच्या काही भागात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मात्र 50 अंश सेल्सिअस तापमान आजपर्यंतचे सर्वाधिक ठरणार नसून यापूर्वीच रेकॉर्ड 52.6 अंश सेल्सिअसचा आहे.
उन्हाळा सुरू राहणार, मात्र गुड न्यूज अशी की…
विविध राज्यांमध्ये उन्हाच्या झळा कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले असून यातून तूर्तास तरी आराम मिळण्याची आशा नाही. असं असलं तरी त्यातल्या त्यात गुड न्यूज म्हणजे, यावेळी पर्जन्यमान अधिक राहील असा अंदाज आहे. मार्चपासून आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा 32 टक्के कमी पाऊस झाला आहे. यावेळी मे महिन्यात सरासरीपेक्षा 109 टक्के म्हणजेच अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर @ ४६.४ अंश सेल्सिअस
उत्तर प्रदेशातील बांदा येथे शुक्रवारी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, झाशी आणि लखनौमध्ये अनुक्रमे ४६.८ अंश सेल्सिअस, ४६.२ अंश सेल्सिअस आणि ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हरियाणातील गुरुग्राम आणि मध्य प्रदेशातील सतना येथेही या महिन्यात सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस आणि ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, दिल्लीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेधशाळेत ४६.४ अंश सेल्सिअस, राजस्थानमधील श्री गंगानगर येथे ४६.४ अंश सेल्सिअस, मध्य प्रदेशातील नागाव येथे ४६.२ अंश सेल्सिअस आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.