नागपूर, दि. 8- करोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नागपूरमध्ये मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच करोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नियम मोडलेल्या रिकामटेकड्या लोकांना तब्बल 14 दिवस न सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दुसऱ्या लाटेची सर्वात अधीक झळ नागपूर शहर आणि जिल्ह्याला बसली आहे. येथे रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहेत. तर दुसरीकडे मृतांचे प्रमाणसुद्दा बरेच आहे. दुसरी लाट अजूनही परतलेली नाही. तसेच कोरोना रुग्णांवर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तसेच नितीन राऊत यांनी मोठे निर्णय घेतले आहे. या निर्णयानुसार नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा बंद करण्यात आल्या.
तसेच नागपूर येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो कोविड हॉस्पिटल लवकर पूर्ण करण्याचे राऊत यांनी निर्देश दिले आहेत. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून एकूण 25 ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचे नियोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात एकूण दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. तसेच करोना रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून तब्बल 5 हजार जंबो सिलिंडर उपलब्ध केले जातील.
दररोज 10 हजार चाचण्या
जेवढ्या जास्त करोना चाचण्या केल्या, तेवढे लवकर करोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात चाचण्या वाढवण्यात येणार आहे. या अंतर्गंत दररोज तब्बल 10 हजार चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सर्व सोयी सुविधांनी सक्षम बनवण्यात येणार आहे.