वाघोली (प्रतिनिधी) – वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून वाघोली मधील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना फोन करून सकाळी दहा वाजता कचरा प्रश्नाबाबत बैठकीस बोलवण्यात आले होते. वाघोली ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ नियोजित बैठकीसाठी सकाळी दहा वाजता वेळेत हजर होते. ११ वाजून १५ मिनिटांपर्यंत अधिकारी बैठकीस अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला अन् ग्रामस्थ या बैठकीतून निघून गेले.
वाघोली मधील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून लोकसंख्येच्यामानाने या कचरा प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात असून या प्रश्नाबाबत ग्रामस्थ देखील शक्य तेवढी मदत व सहकार्य पुणे मनपा प्रशासनास करताना दिसत आहे.
मात्र काही ठराविक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बैठकीला वेळेत हजर राहून देखील ग्रामस्थांना केवळ अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही या कारणाने माघारी परत जावे लागले आहे. याबाबत अधिकाऱ्यांविरुद्ध नागरिक पुणे मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे.
१८ महिन्यानंतर ग्रामस्थांची बैठक..
वाघोली चा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोलीतील समस्या सोडवण्यासाठी पुणे मनपा प्रशासन व ग्रामस्थ यांची ही पहिलीच बैठक होती याही बैठकीस वेळेत उपस्थित न राहिल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे.
वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून कचरा प्रश्नी फोन आल्यानंतर सकाळी दहा वाजता बैठकीला ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. मात्र कचरा प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याने ते वेळेत हजर राहिले नसल्याने नागरिक या बैठकीतून निघून गेले. याबाबतीत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात येणार आहे.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली
नियोजित बैठकीला ग्रामस्थ वेळेवर हजर होते मात्र अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्यामुळे नाराज होऊन ग्रामस्थ निघून गेले आहेत. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येत आहे.
– संजय शिवले, अधीक्षक, वाघोली कार्यालय