नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.याच बैठकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘विरोधी पक्षांची बैठक हे बेईमान लोकांचं संमेलन असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे.
बंगळुरुमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “विरोधी पक्ष फक्त त्यांच्या कामांना प्राधान्य देतात, ज्यामुळे फक्त त्यांचा आणि त्यांचा कुटुंबाचा फायदा होतो. परिणामी या भागांचा विकास होतं नाही. यामुळे देशातील आदिवासी भाग आणि बेटांच्या विकासात अडथळे येतात आणि येथील जनता सुविधांपासून वंचित राहते. असे म्हणत, ”2024 साठी 26 पक्ष एकत्र येत आहेत. काही लोक भारताची दुर्दशा करण्यासाठी दुकान उघडून बसले आहेत. हे लोक देशासोबत बेईमानी करण्यासाठी संमेलन भरवत आहेत. हे लोक घोटाळेबाजांना मान देत आहेत. तुरुंगात जाणाऱ्या लोकांना विशेष सन्मान दिला जातो. आजकाल हे लोक बंगळुरूमध्ये जमले आहेत. हे जातीवादी आणि भ्रष्ट लोक आहेत. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा निशाणा साधत पुढे म्हणाले की, ”2024 साठी देशातील जनतेने आपले सरकार परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. त्यांच्याकडे बघून मला एका कवितेची आठवण होते, ‘गायत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है माल कुछ है’. हे गाण विरोधी पक्षांसाठी अनुकूल आहे,” असं पंतप्रधान म्हणाले.
विरोधकांच्या सभेवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, ‘या लोकांना भ्रष्टाचाराची खूप आवड आहे. हे लोक कुटुंबवादाचे समर्थक आहेत. हे लोक प्रथम कुटुंबासाठी काम करतात. कुटुंबावर आधारित पक्षाने देशाचा विकास केला नाही. बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार झाला, पण हे पक्ष काहीही बोलले नाहीत. दारू घोटाळ्यावरही हे पक्ष काहीच बोलत नाहीत,”असाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.