मेढा – जावळी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या विळख्यात विद्यमान सदस्य व माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचे पती ज्ञानदेव रांजणे व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचा पत्ता कट झाल्याने कमालीची राजकीय शांतता असली तरी पंचायत समितीचे आरक्षण “कही खुशी, कही गम’ झाल्याने तू तू मै मै’ सुरु झाले आहे.
कुसुंबी गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने प्रमुख इच्छुक उमेदवार जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम, तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे यांना थांबावे लागणार असले तरी आंबेघर तर्फ मेढा गण खुला झाल्याने येथेही इच्छुकांची मोठी संख्या आहे. येथे आंबेघर गणातून सदस्य होऊन सभापतीपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे ज्ञानदेव रांजणे, एकनाथ ओंबळे यांना हा एक मोठा पर्याय आहे.
या गणातून युवा नेते सागर धनावडे, आनंदराव जुनघरे, बाजीराव धनावडे, मोहनराव कासुर्डे, अनिल धनावडे आदी अनेक इच्छुक आहेत. कुसुंबी गटातून ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे या गटातून अनिता विजय सपकाळ, मनीषा संतोष कदम, माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मला दुधाणे यांच्या नावांची चर्चा आहे. कुसुंबी गणातून सौ. मनाली शेलार यांचेही नाव पुढे आले आहे. म्हसवे गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथे वसंतराव मानकुमरे यांची संधी गेली असली तरी ही सत्तास्थाने त्यांच्या हातात ठेवताना ते त्यांची पत्नी जयश्री मानकुमरे यांना उमेदवारी घेतील, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर इतरही महिला इच्छुक आहेत. म्हसवे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग व खर्शी गण सर्वसाधारण महिलेसाठी झाल्याने येथेही अनेकांची गोची झाली आहे.
जिल्हा परिषदेचा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारा कुडाळ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग झाल्याने विद्यमान सदस्य दीपक पवार यांना थांबावे लागणार आहे. तर सौरभ शिंदे यांनाही परत पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या गटातून सध्या तरी माजी सभापती सुहास गिरी, माजी सभापती जयश्री गिरी, माजी जिल्हा परीषद सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर, महेश बारटक्के, दीपक देशमाने, दादा रारसकर, दादा पाटील आदींची नावे चर्चेला आहेत.
कुडाळ गण सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने या गणातून इच्छुक असणारे जयदीप शिंदे यांचा पत्ता कट झाला असला तरी महिला कार्यकर्त्याची चाचपणी सुरु आहे. सायगाव गण सर्वसाधारण खुला झाल्याने अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये समिंद्रा जाधव, अँड. शिवाजीराव मर्ढेकर, विलासबाबा जवळ, सुरेश गायकवाड यांची चर्चा सुरु आहे.