तीन महिन्यांनंतरच्या दरांचा अंदाज मिळणार
पुणे – टोमॅटो, कांदे आणि बटाट्याचे तीन महिन्यांनंतर कोणत्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे याची माहिती देणारे पोर्टल अन्नप्रक्रिया मंत्रालयाने तयार केले आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतर भाज्यांचे दर वाढणार असतील तर अगोदरच केंद्र सरकार निर्यात आणि इतर उपाययोजना करू शकणार आहे.
केंद्र सरकारने अगोदरच या कामासाठी ऑपरेशन ग्रीन योजना सुरू केली आहे. एखाद्या राज्यात भाज्यांचे प्रमाण जास्त असेल आणि दुसऱ्या राज्यात कमी असेल तर दोन्ही राज्य सरकारना समन्वयाने उपाययोजना करता येऊ शकतील. या पोर्टलवरून भाज्यांचे दर तीन वर्षांच्या निचांकावर जाणार असतील तर त्याची माहिती दिली जाईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी कमी झाले असतील तर त्याची माहिती मिळेल. “नाफेड’ या संस्थेने हे पोर्टल विकसित केले आहे. टोमॅटो, कांदे आणि बटाट्यांची एकात्मिक बाजारपेठ विकसित करण्याचा यामागे दृष्टिकोन आहे.
कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांची मिळणार माहिती
कृत्रिमरित्या भाज्यांचा तुटवडा निर्माण करणाऱ्याची माहिती मिळणार असून सरकारला वेळीच हस्तक्षेप करून हा गैरप्रकार रोखता येणार आहे. एखादे उत्पादन जास्त होते किंवा कमी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. ही यंत्रणा विकसित झाल्यानंतर यामध्ये बरीच स्थिरता येऊ शकेल, अशी आशा नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंह यांनी व्यक्त केली.