पुणे – देशाच्या किनारी भागात मे महिन्यात म्हणजे भर उन्हाळ्यात धडकलेल्या “तौक्ते’ आणि “यास’ या चक्रीवादळांमुळे महाराष्ट्रात 31 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्यात तौक्ते वादळ अरबी समुद्रात तयार होऊन, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धडकले होते.
तर “यास’ चक्रीवादळ बंगाल उपसागरात तयार होऊन, ओडिसा किनारपट्टीला धडकले होते. त्यामुळे देशाच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मे महिन्यात राज्यात सुमारे 107.9 मिमी पावसाची नोंद झाली होती.
सन 1990 रोजी मे महिन्यात सुमारे 110.7 मिमी पावसाची नोंद झाली. सन 1990 पासून केवळ पाच वेळा तीन अंकी संख्येत पावसाची नोंद झाली होती. त्यामध्ये यंदाच्या वर्षाचादेखील समावेश आहे. तर, सन 1990 नंतर म्हणजेच 31 वर्षांनी दुसऱ्या क्रमांकावर यंदाच्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. तर देशाच्या 64 टक्के भागात मे महिन्यात अधिक पावसाची नोंद झाली.
यामध्ये मध्य, वायव्य, दक्षिणेकडील भागांचा समावेश आहे. “यास’ चक्रीवादळामुळे बंगाल, झारखंड, बिहार, ओडिसा आदी भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर “तौक्ते’ वादळामुळे कोकण, गोवा, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला.
या पावसाचा उपयोग काय?
मे महिन्यातील चांगला पाऊस हा खरीप हंगामापूर्वीच्या शेतीकामांसाठी फायदेशीर ठरतो. तर जून महिन्यात सातत्याने पडलेला पाऊस फायदेशीर ठरतो. यंदा पावसाची हीच परिस्थिती असणार आहे, असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. त्यामुळे मे आणि जून पाऊस फायदेशीरच राहिल, असे कृषी हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.