- “पर्यटन बंदी’मुळे मावळातील अर्थचक्राला खीळ
- कृषी पर्यटन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ
- स्थानिक विक्रेते, व्यावसायिक अडचणीच्या फेऱ्यात
पिंपरी – राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी सोमवारपासून (दि. 5) फूड कोर्टस्, रेस्टॉरंट खुली करण्यात येणार आहेत. करोना महामारीमुळे काही काळ “लॉक’ असलेली पर्यटननगरी हळूहळू खुली होत पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे मात्र पर्यटनबंदीमुळे मावळसह लोणावळ्यातील स्थानिक विक्रेते, व्यावसायिक अर्थचक्रात अडकल्याचे वास्तव आहे. व्यावसायिकांच्या विस्कटलेल्या “घडी’ला मार्ग दाखविण्यासाठी पर्यटन बंदी अडथळा ठरत असल्याने राज्य शासनाने पुढाकार घेत निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जोर धरीत आहे.
करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्चमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनावर बंदी घातली आहे. त्यामुळे लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटन थांबले आहे. पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदीचा आदेश लागू असल्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, सहारा पूल यांसह मावळातील गड-किल्ले आणि कृषी पर्यटन केंद्र याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक मावळ आणि लोणावळ्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय कृषी पर्यटन केंद्र चालकही अडचणीत सापडले आहेत.
मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ आणि नाणे मावळात कृषी पर्यटन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय मावळ तालुक्यातील खासगी नौकानयन (बोट सफर) आणि कृषी पर्यटन सुरू करण्याकरीत मावळातील बोट भाडे माफ करावे आणि कृषी पर्यटनास परवानगी द्यावी, यासाठी व्यावसायिकांनी आमदार सुनील शेळके यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी पवना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासंदर्भात आमदार शेळके यांना निवेदन दिले होते. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे चित्र दिसून येत आहे. याशिवाय लोणावळा, पवनानगर परिसरातील पोलिसांनी काही “चेकपोस्ट’ बंद केले असले तरी पर्यटनस्थळे सुरू झालेली नाहीत, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.
कृषी पर्यटन केंद्र चालक म्हणतात…
हा तर “तोंड बांधून’ बुक्क्यांचा मार
पवना धरणासाठी या भागातील 19 गावे, वाड्या-वस्त्यांमधील 1203 खातेदारांची जमीन प्रकल्पात गेली. यातील 340 खातेदारांना खेड, चाकण, आंबी याठिकाणी प्रत्येकी 4 एकर जमीन देऊन पुनर्वसन केले; परंतु उर्वरित 863 खातेदार अद्याप पुनर्वसनापासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून पुनर्वसन होत नसल्याने सन 2013 साली मुंबई उच्च न्यायालात याचिका दाखल केली, यामध्ये पवना धरणासाठी अतिरिक्त जमीन संपादित केली आहे. ती मूळ मालकांना द्यावी, ज्याप्रमाणे 340 खातेदारांना 4 एकर जमीन दिली. त्याचपद्धतीने उर्वरित खातेदारांना 4 एकर जमीन देऊन पुनवर्सन करावी, ही मागणी केली आहे. एकीकडे आम्हाला आमचा न्याय मिळत नाही, तर दुसरीकडे “लॉकडाऊन’मुळे आमच्या व्यवसायाला खीळ बसली. त्यामुळे करोना महामारीच्या काळात शासनाकडून “तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सुरू असल्याची भावना काही खातेदारांनी व्यक्त केली.
लोणावळ्यातील उद्याने अजूनही “लॉक’च
पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी लोहगड दर्शन भांगरवाडी, इंद्रायणी गार्डन, रायवूड तुुंगार्ली, खंडाळा आदी भागात उद्याने विकसित करण्यात आली आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक, महिला येत, मात्र करोना महामारीमुळे नागरिकांची दिनचर्या बदलून गेली. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घराबाहेर फिरण्यास बंदी आली. शहरातील सर्व उद्याने गेल्या सहा महिन्यांपासून ओस पडली आहेत. खेळण्यावर गंज चढला असून, प्लास्टिक खेळण्यांवर शेवाळांमुळे खराब झाली आहेत. याशिवाय उद्यानात सर्वत्र गवत वाढले असल्याची सद्यस्थिती आहे.
सध्या करोना महामारीमुळे राज्यात अनलॉक-5 सुरू झाले आहे. लॉकडाऊनपासून गेली सहा महिने आमचा बोटिंगचा व्यवसाय बंद आहे. चालू वर्षात 2020-21 ची अनामत रक्कम (बोट भाडे) प्रशासनाने माफ करावी. तसेच शासनाने अद्यापही कृषी पर्यटन सुरू केले नाही, ते सुरू करून आमच्यावर आलेली उपासमार टाळावी.
– मधूकर कोकाटे, गबळू मालपोटे, कृषी पर्यटन चालक.