चंदीगड – केंद्र सरकारच्या नव्या शेतीविषयक विधेयकांच्या विरोधात पंजाबातील शेतकऱ्यांनी आज पासून तीन दिवसांची खेती बचाव यात्रा व ट्रॅक्टर रॅली आयोजित केली असून या रॅलीचे उद्घाटन आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की शेतकऱ्यांना जी किमान आधारभूत किंमत देण्याची सध्याची पद्धत आहे ती पद्धत आणि सरकारकडून केली जाणारी धान्य खरेदीची पद्धत मोदी सरकारला बंद पाडायची आहे. पण आम्हीं तसे होऊ देणार नाही. केंद्रात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने केलेले सर्व काळे कायदे रद्द केले जातील अशी घोषणाही त्यांनी केली.
ते म्हणाले की किमान आधारभूत किंमत, सरकारी धान्य खरेदी आणि घाऊक बाजार हे तीन शेतीचे मुख्य आधार आहेत ते जपले पाहिजेत. या देशातला शेतकरी किमान आधारभूत किंमतीच्या व्यवस्थेशिवाय जगूच शकत नाही.
ही वस्तुस्थिती सरकारने लक्षात घ्यायला हवी. शेतकऱ्यांना बाजार समित्यांची गरज नाही, ते आपला माल कोठेही विकू शकतात त्यामुळे देशातील बाजार समित्या बंद पाडल्या जाणार आहेत.
या बाजार समित्यांना जोडणारे रस्तेही उद्धवस्त केले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही अवघड स्थिती आहे असे ते म्हणाले. बाजार समित्यांच्या सिस्टीम मध्ये काही तृटी असतील तर त्या दूर करणे शक्य आहे. पण त्या दूर करण्याऐवजी बाजार समित्यांच्या पद्धतच रद्द करणे योग्य नाही असे ते म्हणाले.