आळंदी – करोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त आळंदी यात्रा होत असल्यामुळे यावर्षी 10 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद अतिक्रमण पथक, पिंपरी महापालिका अतिक्रमण पथकाकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आळंदी शहरातील मुख्य प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरातील भराव रस्ता, महाद्वार रोड, चावडी रोड, चाकण रोड, नवीन पुल, जुना पुल, मंदिर परिसर व इतर परिसरातील ठिकाणी अतिक्रमण करून बसलेले पथारीवाले, हातगाडीवाले, खेळणीवाले, पेढेवाले, आदी अतिक्रम काढण्याची कारवाई सुरु आहे. सोमवारी (दि. 14) देहू फाटा व इतर ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य आळंदी नगरपरिषद जुनी इमारत या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. दंडाची रक्कम वसुल करून जप्त करण्यात आलेले साहित्य कार्तिकी यात्रा कालावधीनंतर परत करण्यात येणार आहे. कार्तिकी कालावधीत मुख्य प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी भाविक भक्त प्रदक्षिणा घालत असतात. त्यामुळे अतिक्रमण पथकामार्फत शहरात वेळोवेळी दैनंदिन तपासणी करून यात्रा कालावधित कुठेही अतिक्रमण होणार नाही व भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता अतिक्रम पथकामार्फत घेण्यात येणार आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, यात्रा कालावधीनंतर पुन्हा अतिक्रमण करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जाधव यांनी दिला.
वारकऱ्यांसाठी सर्व रस्ते मोकळे करणार – शहाजी पवार
स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरात सोमवारी देहू फाटा येथे धडक कारवाई करून अतिक्रम हटवले. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून फुटपाथ व रस्ते मोकळे करण्यात येत आहे. कोणाचीही तमा न बाळगता अतिक्रमण हटविण्यात येईल. शिस्तबद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी सर्व रस्ते मोकळे करणार आहोत, असे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – कार्तिकी यात्रा 2022: वाहन पास घेण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी
हेही वाचा – Alandi Kartiki Yatra 2022: आळंदीत दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात; राहुट्या, पाल उभारण्याची लगबग