हातगाड्यांची जागा घेतली आलिशान कार्सने : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे
राजगुरूनगर : शहरातील गरिबांच्या हातगाड्यांची जागा आलिशान कार्सने घेतली असून शहरातील वाहतूक कोंडी आहे, तशीच आहे. अतिक्रमण कारवाईने काय साध्य झाले, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राजगुरूनगर शहरात महिन्यापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई झाली. त्यात वाहतुकीला अडथळा येतो म्हणून वाडा व पाबळ रस्त्यालगतच्या हातावर पोट असलेल्या टपरीधारक, हातगाडी चालकांवर हातोडा टाकण्यात आला. कारवाईनंतर रस्ता मोकळा झाला. पण या जागेवर नगरपरिषदेच्या माध्यमातून अधिकृत व मोफत चारचाकी पार्किंग होऊ लागले आहे. दिवसभर पार्किंग होणाऱ्या अलिशान वाहनांमुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. पंचायत समिती चौकात दिवसभर अनेकदा वाहतूककोंडी होत असून यामुळे कारवाईने काय साध्य झाले, असे प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
शहरात महिन्यापूर्वी रस्ता, वाहतुकीच्या कोंडीवरून एक दुर्घटना घडली. त्याचे खापर गरीब, बेरोजगार हातगाडी, टपरीधारकांवर फोडण्यात आले. त्यांच्या विरोधात वाजत-गाजत कारवाई झाली. ऐन दसरा, दिवाळी साजरी होत असताना हातगाड्या, टपऱ्या, पथारीधारक गरिबांच्या घरी भुकेचा अंधार पडला. कारवाईत मोकळ्या झालेल्या जागेवर अलिशान गाड्या पार्क होऊ लागल्या असून राजगुरूनगर शहरातील वाहतुकीच्या समस्येने पुन्हा नव्याने उग्र रूप धारण केले आहे.
गरिबांच्या हातगाड्या,टपऱ्या बरोबर वाहतुकीला प्रमुख अडथळा अतिक्रमण असलेल्या धनिकांच्या पक्या बांधकामांवर कारवाई का केली नाही, असेही आक्षेप घेतले जात आहेत. राजगुरूनगर शहरात खड्डेमय रस्ते आणि रस्त्यालगतच्या हातगाड्या, टपऱ्या व बेशिस्त पार्किंग यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. शहरातील वाडा रस्ता हा त्या दृष्टीने अधिक जोखमीचा बनला आहे.
आश्वासन हवेतच विरले
गरिबांना हटवून धनिकांची सोय केली. अशा प्रकारच्या जोरदार चर्चा शहर परिसरात आहेत. शिवाय कारवाई केली त्यावेळी सर्वच अधिकारी वर्गाने उठवण्यात आलेल्या लहान व्यावसायिकांना सोयीस्कर जागा देण्याचे आश्वासन दिले होते. महिना उलटला मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस पावले अद्याप तरी उचलली नाहीत.