नवी दिल्ली – भारतात वाहनांची विक्री वाढत आहे. आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मारुती सुझुकी कंपनी आपले उत्पादन क्षमता आठ वर्षात सध्याच्या 20 लाख वाहनावरून 40 लाख वाहन प्रति वर्ष करणार आहे. यासाठी या कालावधीत 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले.
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना भार्गव म्हणाले की, कंपनी संचालक मंडळाकडे स्टॉक स्प्लीट करण्याच्या शक्यतेवर चर्चा करणार आहे, भारताबरोबरच जगातील इतर देशांनी कार्बन उत्सर्जन करण्याचे कमी करण्याचे ठरविले, अशा परिस्थितीत परंपरागत वाहनाऐवजी इलेक्ट्रिक वाहन हायब्रीड सीएनजी, इथेनॉल इत्यादी आधारावर वाहनाची निर्मिती होणार आहे, त्यामुळे पुढील दहा वर्षांमध्ये मारुती सुझुकी कंपनीला विविध क्षेत्रात संशोधन आणि विकाससात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे.
40 वर्षात मारुती सुझुकी कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढऊन आता 20 लाख कार प्रति वर्ष केली आहे. पुढील आठ वर्षात एकूण मागणी पाहता ही क्षमता 40 लाखापर्यंत वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील आठ वर्षात 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबरोबरच या कालावधीत विविध प्रकारातील 28 नव्या कार बाजारात सादर कराव्या लागणार आहेत.
भारतातील कार उद्योग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कार उद्योग झाला आहे. या कार उद्योगाचे नेतृत्व मारुती सुझुकी कंपनी करीत आहे. त्यामुळे भविष्याबाबत आम्हाला अधिक नेटाने काम करावे लागणार आहे. सध्या मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 10 हजार रुपये आहे. त्यामुळे जास्त गुंतवणूकदारांना या शेअरच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. अशा परिस्थितीत स्टॉक्स स्प्लीट करणार का असे एका भागधारकांने विचारले असता ते म्हणाले की, या शक्यतेवर आम्ही संचालक मंडळात चर्चा करणार आहोत.
इलेक्ट्रिक वाहनास उशिर
मारुती सुझुकी कंपनीने इलेक्ट्रिक वाहन सादर करण्यास उशीर केला आहे का असे विचारले असता भार्गव म्हणाले की, भारतात काही कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर केली आहेत. त्या तुलनेत मारुती सुझुकी कंपनीला हे वाहन सादर करण्यास उशीर झाला. मात्र या विषयात आमचे काम चालू असून 2024-25 मध्ये आम्ही इलेक्ट्रिक वाहन सादर करणार आहोत.