राजगुरूनगर -चिखलगाव (ता. खेड) येथे 28 वर्षीय महिलेने तिच्या सात व चार वर्षांच्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.
सुरेखा उत्तम गोपाळे (वय 28), धनश्री (वय 7) व तृप्ती (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. याबाबत सुरेखाचा भाऊ रामचंद्र काशिनाथ मोरे (रा. देवोशी, ता. खेड) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरगुती कारणास्तव पती पत्नीची भांडणे होत होती.
त्यातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. सुरेखाचा नवरा उत्तम रघुनाथ गोपाळे (वय35) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिखलगाव येथे शुक्रवारी (दि. 17) दोन लहान मुलींसह आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरेखा आपल्या दोन मुलीसह उन्हाळी बाजरीला पाणी देण्यास शेतात गेली होती. तर पती उत्तम हा कृषी पंप चालू करण्यास गेला होता.
दुपारी तीनच्या सुमारास सुरेखा व दोन लहान मुलींचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. खेड पोलिसांना माहिती कळवून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले.