बीड : तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर फरशी नसलेल्या जागेवर बसून बारावीची परीक्षा द्यावी लागली. या परीक्षाकेंद्रावर काही विद्यार्थ्यांना चक्क जिल्हा परिषद शाळेतील डेस्क बसण्यासाठी देण्यात आले होते. या प्रकारानंतर शिक्षणविभागाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होतं आहे.
दरम्यान, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (18 फेब्रुवारी) सुरु झाली. राज्यातील एकूण 3036 परीक्षा केंद्रांवर 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 784 विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे 57 हजार 373 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.