पुणे – मार्केट यार्डात अनेक समस्या आहेत. या समस्य सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात, त्यामध्ये उपाय सुचविले जातात. मात्र, ते उपाय कागदोपत्रीच राहत आहेत.
बाजार समिती प्रशासकाने दिलेल्या आदेशाची अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांकडून अंमलबजावणी होतच नसल्याचा आरोप बाजारातील प्रमुख संघटनांनी केला आहे. याचा व्यापारावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आणि बाजार बंद ठेवयाचा इशारा विविध संघटनांकडून देण्यात येत आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनत, दी पुना मर्चंट्स चेंबर, कामगार युनियनने याबाबत तक्रार करणारे निवेदन प्रशासकांना दिले आहे. बाजार आवारात चोऱ्या, दमदाटीचे प्रकार वाढले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या होत्या. दररोज पहाटे किरकोळ खरेदीदार टेम्पो घेऊन बाजार आवारात येतात.
प्रवेशद्वार क्रमांक एकमधून पहाटे तीन ते पाच या वेळेत शंभर टेम्पो सोडावेत, असे बैठकीत ठरले होते. मात्र, बाजार समितीचे कर्मचारी, सुरक्षारक्षक टेम्पोला प्रवेश देत नाही. त्यामुळे टेम्पोची रांग लागते. बाजार आवार मोकळा असतो. मात्र, टेम्पो आत सोडले जात नाही. भाजीपाला नाशवंत आहे. त्यामुळे विक्रीवर परिणाम होत असल्याचे आडते असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाजारातील समस्यांबाबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासकांबरोबरच ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. बाजार समितीचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सहकार्य करत नाहीत. सुरक्षारक्षकांचा तुटवडा असून, यंत्रणा विस्कळीत आहे. आधीच व्यापाऱ्याला करोनाचा फटका बसला. व्यापाराची परिस्थिती कठीण बनली आहे. या गोष्टीला वेळी आवर घातला पाहिजे. अन्यथा येथील व्यापाराचे भव्यतव्य कठीण दिसते
– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन
पूर्वीच्या प्रशासंकाच्या काळात बैठकीत झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजाणी होत असत. सर्व प्रश्न लगेच मार्गी लागायचे. मात्र. आताच्या प्रशासकांसोबत बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नाही. प्रशासकांना हलक्यात घेतले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासकांनी प्रशासकीय कौशल्य दाखवावे. बाजारातील सर्व समस्या सोडवाव्यात.
– संतोष नांगरे, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन
दि पुना मर्चंट्स चेंबरचा आंदोलनाचा इशारा
बाजार समिती प्रशासन आणि चेंबरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये 2 डिसेंबर रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि सभासदांच्या दुकानाबाहेरील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याच्या विषयावर चर्चा झाली. ही सर्व कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्याप ही कामे झालेली नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेंबरने प्रशासकांना पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे. त्यावर मानद सचिव विजय मुथा यांची सही आहे. दरम्यान व्यापारी लाखो रुपयांचा सेस भरतात. मात्र, व्यापाऱ्यांना किमान पायाभुत सुविधा मिळत नाहीत. रस्ते खराब बनले आहेत. याबाबत दि पुना मर्चंट्स चेंबरने पत्र दिले आहे. मात्र, त्यावर कोणतही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर एक दिवसाचा टोकन बंद ठेवून, बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधावे, अशा मागणीचे पत्र स्थानिक भागातील भाजपचे नगरसेवक आणि चेंबरचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रवीण चोरबेले यांनी चेंबरला दिले आहे.