-अमित डोंगरे
ॲडलेडला मानगुटीवर बसलेले भूत अखेर मेलबर्नला उतरले व भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ज्या भाषेत प्रश्न विचारले गेला होता, त्याला त्याच भाषेत भारताने उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय सर्जिकल स्ट्राइक होता असेच म्हटले पाहिजे.
भारतीय संघाच्या ॲडलेडवरील गचाळ कामगिरीनंतर संघाच्या गुणवत्तेवरच शंका घेतल्या गेल्या होत्या. त्यातच नियमित कर्णधार विराट कोहली, महंमद शमी या बिन्नीचे शिलेदार मेलबर्न कसोटीपासून भारतीय संघात नसणार हे स्पष्ट झाल्यावर तर भारताच्या यशस्वी पुनरागमनाबाबत कोणीही आशावादी नव्हते. हा विजय त्याचसाठी महत्त्वाचा ठरला. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो या म्हणीप्रमाणे भारताच्या पराभवाचे दुःख नाही पण समालोचक सोकावतात, असेच म्हणावेसे वाटते.
ॲडलेडला नीचांकी धावसंख्या नोंदवल्यावर तर भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करूच शकत नाही, त्यांना व्हाइटवॉशच मिळेल वगैरे तारे तोडणारे काही कमी नव्हते. कोहली मायदेशी परतला व अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व आले आणि त्याने चमत्कार घडवून दाखवला. पहिल्या डावात गोलंदाजांच्या अत्यंत अचूक कामगिरीच्या बळावर यजमानांना दोनशे धावांच्या आत रोखले. रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा प्रचंड अभ्यास केल्याचे या सामन्यात जाणवले.
प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ, मार्नस लेबूशेन यांच्यासाठी त्याने योजना बनवली व त्या बरहुकूम गोलंदाजांनी विशेषतः जसप्रीत बुमराह व महंमद सिराजने गोलंदाजी केली. सिराजकडे मोठा गोलंदाज बनण्याची क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीचे कौतुक खुद्द ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनेही केले आहे. हा सामना फलंदाजी, गोलंदाजी यांच्याबरोबरच रहाणेचे अत्यंत चलाख नेतृत्व आणि त्याचे फिल्ड प्लेसिंग यांच्या जोरावर भारताने जिंकला.
पहिल्या डावात रहाणेने शुभमन गिल व रवींद्र जडेजाला साथीला घेत रहाणेने दमदार शतकी खेळी करत संघाला त्रिशतकी धावांची मजल मारून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या गोलंदाजांनी यजमानांच्या फलंदाजीची वाताहत केली. विजयासाठी आवश्यक 70 धावाही पूर्ण केल्या व हा सामना 8 गडी राखून जिंकत मालिकेतही बरोबरी केली. हा विजय रहाणेच्या सरस कामगिरीचे व नेतृत्वाचे फलित असले तरीही त्यात सांघिक कामगिरीची मोलही खूप महत्वाचे आहे. आता ही मालिका जास्त रंगली आहे. अजून दोन कसोटी सामने बाकी असून भारतीय संघ विजयाच्या मार्गावरच वाटचाल करेल असाही विश्वास या विजयाने दिला आहे.
ज्या संघात कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महंमद शमी हे स्टार नसतानाही हा विजय मिळाला हे महत्त्वाचे. ऍडलेडच्या कसोटीत भारताचा दुसरा डाव 36 धावांवर संपल्यामुळे अनेकांना तोंड फुटले होते. अनेक टीकाकार भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलू लागले होते. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे होते. या संघात रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हे चारच खेळाडू अनुभवी होते. बाकी सगळे खेळाडू नवोदित तर होतेच पण ऑस्ट्रेलियाविरुद्धही जास्त खेळलेले नव्हते. गिल व नवोदित वेगवान गोलंदाज महंमद सिराज यांनी तर कसोटी पदार्पण केले होते.
कोहलीच्या अनुपस्थितीत या सगळ्यांची मोट बांधत तसेच ऍडलेडचा पहिला सामना अत्यंत दारुण पद्धतीने गमावल्यानंतर संघाचे सुकाणू हाती आलेल्या रहाणेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आता रहाणेवरील जबाबदारी वाढली आहे. त्याचे या कसोटीत बारावे कसोटी शतकही वर्चस्व सिद्ध करणारे ठरले. आता मागे वळून पाहू नये, उरलेल्या दोन्ही कसोटीत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर द्यावा आणि दोन वर्षांपूर्वीच्या इतिहासाचीच यंदाही पुनरावृत्ती भारतीय संघाने करावी हीच अपेक्षा आहे.