ओतूर -सध्या कांद्याला बाजारभाव मिळत असल्याची चर्चा असली तरी शेतकरीराजा आपली व्यथा स्वतःशीच मांडून अगदी डोक्याला हात मारून बसला आहे. याचे कारणही तसेच आहे, उशिराने का होईना कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील या एकाच आशेवर चाळीत साठवलेला कांदा सडायला सुरुवात झाली आहे. निम्म्याहून अधिक कांदा फेकून द्यायला लागत आहे.
गेल्या काही दिवसात कांद्याला जेमतेम भाव मिळू लागले; परंतु चाळीतून सडलेलाच कांदा हातात येऊ लागल्यामुळे कांद्याला बाजारभाव बरे, पण कांदा टिकला तरच खरे, असे म्हणण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आलेली आहे. मेहनत करून जीवापाड जतन केलेला कांदा सडल्याने तो बराखीतून काढून फेकून देताना शेतकऱ्याच्या डोळ्यांतून अक्षरशः पाणी येऊ लागले आहे. कांदापिकावर आर्थिक मदार अवलंबून असल्याने व भांडवलही गमावण्याची पाळी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
बळीराजाच्या कर्जात भर
सद्यस्थितीत कांद्याला बाजारभाव वाढल्याची चर्चा होत असली; तरी मात्र अनेक संकटांना तोंड देत राखून ठेवलेला कांदा आजही उत्पादन खर्च काढील की नाही याची शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे. सडलेला कांदा वाहून नेऊन फेकून देण्याचा अतिरिक्त खर्चही परवडत नसल्याने बळीराजाच्या कर्जात भर पडणार आहे.