दौंड -बदलते वातावरण आणि ऊन थंडीच्या खेळामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासूनच उन्हाळ्याची दाहकता सुरू झाली आहे. दिवसा ऊन तर रात्री उकाडा तर पहाटे थंडी अशा तिहेरी वातावरणाचा परिणाम नागरिक, जनावरे व पिकांवर होत आहे. यामुळे शेतकरी, नागरिक व तरूण वर्गही वातावरणाच्या कचाट्यात सापडला आहे.
या दुषित वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, नाक चोंदणे, नाक गळणे, डोकेदुखी, अशक्तपणा यांसारखे अनेक आजार नागरिकांना होत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे खासगी व सरकारी रूग्णालयांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
या वातावरणामुळे पिकांवरही मोठ्या प्रमाणात किडी, रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गहू पीक तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहे. यातील काही गहू काढणीला आला आहे. मात्र काही प्रमाणात उशिरा पेरलेला गहू आता वातावरणीय संकटात सापडला आहे. त्याच्यावर मावा रोग पडण्याची शक्यता आहे. तालुक्यात फळबागांचे प्रमाणही मोठे आहे. त्यात अनेकांनी आता खरबूज, कलिंगड व काकडी या पिकांची लागवड केली आहे. या फळबागा, वांगी, कोबी, टोमॅटो, भेंडी यांच्यावरही सध्या रोगराई वाढत आहे.
शेतकरी आलाय मेटाकुटीला
तालुक्यातील काही भागातील गहू काढणीला आला आहे. तर मागास गव्हाची उगवण झाली आहे. काढणीला आलेल्या गव्हाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र आहे. तर मागास गव्हावर मावा व इतर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी फवारणी करून मेटाकुटीला आला आहे. फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ होत आहे.