पुणे (कल्याणी फडके) – “इतिहास पाहिल्यास प्रत्येक वेळी मराठी भाषा बदलत गेल्याचे दिसते. इंदौर, गुजरात, बडोदा, छत्तीसगड अशा प्रांतांतही मराठी पोहोचली आहे. त्या व्यक्तींची मराठी भाषेची तळमळ आणि त्यांनी जपलेल्या परंपरा पाहता तेथील व्यक्तींमुळे मराठी जिवंत आहे, असे लक्षात येते. इतकेच नव्हे तर, परदेशांत पोहोचलेल्या मराठी माणसांनी देखील भाषा जिवंत ठेवली आहे. त्याठिकाणी मराठीचा वावर त्यांच्या धमन्यांतून वाहताना दिसतो, हा आपला इतिहास आहे,’ अशा शब्दांत भारत सासणे यांनी आपले मत व्यक्त केले.
आगामी 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांना यंदाचा राज्य शासनाचा “विं.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला. साहित्य संमेलन अध्यक्षपद आणि पुरस्कार या दुहेरी योगाच्या पार्श्वभूमीवर सासणे यांच्याशी “प्रभात’ने विशेष संवाद साधला. त्यांची ही मुलाखत खास “प्रभात’च्या वाचकांसाठी.
आजकाल इंग्रजीसह परकीय भाषा शिकण्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होते, की मराठीला ग्राह्य धरले जात आहे ?
“ही समस्या अनेक वर्षांपासून आहे. मराठीने अनेक भाषांचे आघात पचवले आहे. फारसी, तुर्की, अरबी आणि उर्दू भाषांतील अनेक शब्द मराठीने स्वीकारले. इंग्रही ही राज्यकर्त्यांची भाषा असल्याने तिचा प्रभाव झालाच. मात्र, तरीही मराठी पुढे गेली आहे. समजणारी आणि अभिव्यक्तीच्या जवळ वाटणारी भाषा तरुणाई बोलत असल्याची स्थिती आहे. मराठी बोलताना “मिंग्लिश’ आणि “हिंग्लिश’, असे अविष्कारही दिसतात. या भाषेत नाटके देखील सादर होत असून, त्यातील संवाद संमिश्र असतो. कारण ही तरूणांची भाषा आहे. आज बोलल्या जाणाऱ्या मराठीबाबत विशेष चिंता बाळगण्याची गरज नाही. त्याउलट मराठी भाषाच त्यांना शिकवेल. ही मराठी भाषाच आपल्याला तारेल,’ असे मला वाटते.
मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत प्रक्रियेला होणाऱ्या विलंबावर आपले मत काय आहे?
“यात राजकारण किंवा अन्य भाग बाजूला ठेवू. मराठीला अभिजात दर्जा मिळायलाच हवा. त्याचे फायदे आणि उपयोगिता असून, ती आपल्याला हवी आहे. यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रमाणपत्र देणे अशी आवश्यकता नाही. मराठी ही आपले अस्तित्व, इतिहास आणि मराठी भूमिच्या अस्मितेशी जोडलेली आहे. शासनाला आपण दिलेला अहवाल मी वाचला. त्यात आपण मराठी भाषा दोन ते अडीच हजार वर्षांपासून बोलली जात असल्याचे पुराव्यानिशी सांगितले आहे. विविध शीलालेख, साहित्य, मौखिक साहित्य, बोलीभाषा, लोकगीते या सगळ्यांतून मराठी भाषा पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दिसते. त्यामुळे आपण हे दाखवून दिले असले आणि कोणत्यातरी राजकारणामुळे याला विलंब होत असला, तरी मराठी भाषा ही अभिजातच आहे,’ असे माझे मत आहे.
“दीर्घकथाकार भारत सासणे’ अशी आपली ओळख आहे.
या कथाप्रकाराबाबत काय सांगाल ?
“अनेक नियतकालिकांतून एकाच वेळेला माझ्या दीर्घकथा प्रकाशित होत होत्या. तेव्हा काही समीक्षक दीर्घकथाकार भारत सासणे असे म्हणत होते. माझ्या पूर्वी जी.ए, चि.त्र्यं. यांनी दीर्घकथा लिहील्या असून, त्यांचे योगदान अधिक आहे. मात्र, मधल्या काळात दीर्घकथा हा वेगळा प्रकार असू शकतो, याकडे आपले दुर्लक्ष व्हायला लागले. त्या काळात मी दीर्घकथा प्रामुख्याने लिहायला लागलो. दीर्घकथेची स्वायत्तता मान्य व्हायला पाहिजे असा माझा आग्रह होता, तो काळाच्या कसोटीवर सिद्ध झाला. कथा आणि दीर्घकथा यातील फरक तांत्रिक आहे. हा फरक बाजूला ठेवला तरी सर्वसामान्य माणसाचे सुखदु:ख आहे ते शोधणे, त्याला केंद्रबिंदू मानून लेखन करणे, त्याच्या बद्दल वैश्विक करुणा मनात ठेवणे, सहकंपित होणे आणि त्याच्या संघर्षाकडे आस्थेने पाहणे ही बाब कथा, लघुकथा आणि दीर्घकथेला आवश्यक बाब वाटते.’