मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून , ४० दिवसांची मुद्दत देऊनही सरकार मराठा आरक्षण प्रश्नी गंभीरता दाखवत नसल्याने आणि कसलाच तोडगा काढत नसल्याने जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या समर्थनार्थ कंधार तालुक्यातील अनेक गावात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरुवात करण्यात आले असून गावागावात राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावबंदी असतांना राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या गावात प्रवेश करू नये किंवा गावातील कोणीही व्यक्तीने राजकीय पुढाऱ्यांना गावात आणू नये असा इशाराही गावागावातील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहेत.
परंतु काल ता.२६ ऑक्टोबर रोज गुरुवारी रात्री नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सहकऱ्यांसह मौजे आंबूलगा ता. कंधार येथे माजी जि. प. सदस्य मनोहर पाटील तेलंग यांच्या घरी आले असता रात्री १०:३० च्या सुमारास आंबूलगा येथील सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची चारचाकी गाडीच्या फोडून नासधूस करत संताप व्यक्त केला. अद्याप कंधार पोलीस ठाण्यात कसलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे बिट जमादार यांच्याकडून कळले.