कोल्हापूर (प्रतिनिधी) – मध्ययुगीन काळातील दख्खनच्या तंजावर, करवीर, सातारा व अन्य मराठेशाहीचा इतिहास, कोकण आणि देशावरील मराठे सरदारांचे शौर्य, पराक्रम, त्यांची कामगिरी, मराठी मंडळाचे उत्तर भारतातील कार्य तसेच दख्खनच्या सत्तेत फ्रेंच, पोर्तुगीज, डच व अन्य युरोपियन राष्ट्रांच्या सत्ता यांच्याविषयी वैचारिक मंथन होऊन आतापर्यंत उजेडात न आलेल्या मराठ्यांचे हे ऐतिहासिक पर्व नव्याने उलगडले जाणार आहे.
यासाठीच “मराठ्यांशी संबंधित युरोपियन शक्तींचे दख्खनमधील संक्रमण : राजकीय आणि परस्परावलंबन’ या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक उमेश कदम यांच्या पुढाकाराने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र दि. 23 व 24 सप्टेंबर 2019 या दिवशी होणार असून यात मराठा इतिहासाशी संबंधित अनेक पैलू नव्याने प्रकाशात येणार आहेत. कोल्हापूरनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 25 सप्टेंबर 2019 या दिवशी हे चर्चासत्र होईल.
जेएनयूमधील इतिहास संशोधक विद्यार्थी अनिल कुमार, डॉली पुरोहित, अंकिता कुमार, शेले ख्रिस्तीन लॅम्रे, अनुराधा, दीपिका सिंग, शिखा कुमारी, आदित्य शर्मा, हेदेखील या चर्चासत्रात आपले अभ्यासपूर्ण विवेचन करतील. मध्ययुगीन काळातील इतिहासात प्रामुख्याने मोगल आणि सल्तनत यांच्याविषयी अधिकांश प्रमाणात लिहिले गेले आहे. मराठा साम्राज्याशी व प्रामुख्याने दख्खनच्या मराठेशाहीचा पराक्रम व कामगिरी दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांच्या कार्याविषयी इतिहासाचा अभ्यास करणा-या नव्या पिढीला त्याची नीटशी माहिती नाही.
म्हणूनच मराठा साम्राज्याचा इतिहास विस्तारण्याच्या अनुषंगाने तसेच त्याची व्यापकता समाजापुढे आणण्यासाठी हे चर्चासत्र महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास जेएनयूमधील अधीक्षक प्रा. उमेश कदम यांनी व्यक्त केला आहे.