पाटण, (वार्ताहर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत दहा टक्के आरक्षणाची घोषणा करताना, यापुढे शासकीय नोकरभरतीत हे आरक्षण लागू होईल, असे सांगितले होते. मात्र, राज्यात महावितरण कंपनी आणि पोलीस दलात सुरु असलेल्या नोकरभरतीत दहा टक्के मराठा आरक्षण दाखल्यांची अंमलबजावणी शासन स्तरावरून सुरू नसल्याने समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे आपली फसवणूक तर झाली नाही ना, अशी त्यांची भावना आहे. सध्या सुरू असलेली मेगा भरती पुढे ढकलावी अथवा थांबवावी, या मागणीचे निवेदन पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
महावितरणमधील साडेपाच हजार जागांच्याभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मार्च, तर पोलीस दलातील 17 हजार जागांच्या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. महावितरणमधील पदांसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली असून, पोलीस भरतीचे अर्ज करण्यासाठी केवळ 11 दिवस बाकी आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या एसईबीसी प्रवर्गातील दहा टक्के आरक्षणासाठी उमेदवारांना मराठा जातीचे दाखले कोणत्या अटी-शर्तींखाली द्यायचे, हेच शासनाने अजून निश्चित केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केल्यापासून नोकरभरतीसाठी मराठा उमेदवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारुन वैतागले आहेत.
येत्या दहा दिवसांत मराठा जातीचे दाखला, नॉन क्रिमिलेयर व उत्पन्नाचे दाखले यांचा मेळ कसा बसवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अद्याप अंतिम मार्गदर्शक आदेश आम्हाला मिळालेले नाहीत, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. पाटण तालुका सकल मराठा समाजाचे हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली मराठा आरक्षणाची घोषणा अद्याप सत्यात उतरलेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती काढून सरकारने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यात मराठा समाजाची घोर फसवणूक झाली आहे. सध्या सुरू असलेली नोकरभरती थांबवून सरकारने मराठा समाजाला एसईबीसीचे दाखले द्यावेत. त्यानंतरच नोकरभरती करावी, अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. – यशवंतराव जगताप
महावितरण आणि पोलीस दलातील पदांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आली असूनही, त्यात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा फायदा झालेला दिसत नाही. या सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. मराठा समाजातील उमेदवारांची ससेहोलपट होत असून, सरकारने ही नोकरभरती तात्काळ थांबवावी. – शंकरराव मोरे